नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने काल सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्रांने देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले केले. या सर्वात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या कामगारांपैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याविषयीची माहिती बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे .
7 labourers who had arrived from Maharashtra via Jhansi in government buses to Basti, have tested positive for COVID19: DM Basti
— ANI UP (@ANINewsUP) May 2, 2020
३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत संपणार होती. मात्र, केंद्र सरकारने काही राज्यांची मागणी लक्षात घेऊन लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी विविध राज्यांनी कामगारांना परत नेण्याच्या मागणीचीही दखलही केंद्राने घेतली. त्यामुळे राज्यांनी विविध राज्यात अडकलेले आपापल्या राज्यातील कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचं काम सुरू केले आहे. कामगारांसाठी विशेष गाड्याही रेल्वे मंत्रालयाने सोडल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. त्यामाध्यमातून विविध राज्यातील कामगारांना परत नेण्याचे काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून कामगारांना बसेसनं घरी पोहोचवले होते. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात सात जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.