नवी दिल्ली : करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्यामुळे लॉकडाऊन कधी उठेल याची शाश्वती देता येत नाही. देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहणार आहे. त्यामुळे लग्नासाठी उतावीळ काही वधू-वरांना आणखी “कड’ काढणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे काहींनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत तर काहींनी ऑनलाईन लग्न उरकले आहे.
काहीनी तर लग्नाच्या खर्चात बचत झाल्याने हे पैसे अन्नदान, तसेच गरजूना मदत म्हणून दिले. यातून सामाजिक बांधिलकी दिसली. खरं तरं करोनाच्या संकटामुळे काहींना अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करावा लागला. परंतु आता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने विवाहसोळ्यांनाही ध्यानात घेऊन काही निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मे पासून सुरु होत आहे. तिसऱ्या टप्प्यात लग्नघरांना थोडी सूट दिली आहे. लॉकडाऊन दरम्यानही विवाहांना परवानगी देण्यात आली आहे, परंतु काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. यातील महत्त्वाची अट म्हणजे वर आणि वधू या दोन्ही कुटुंबातील फक्त 50 व्यक्तींनाच विवाहाला हजेरी लावता येईल.