बीसीसीआयने व्यक्त केले मत; विंडो मिळाली तर आयपीएल होणार
मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. मात्र, करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता ही स्पर्धा होण्याची शक्यता नसल्याचे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे. इतकेच नव्हे तर जर ही स्पर्धा पुढे ढकलली गेली तर त्यावेळी मिळणारी विंडो आयपीएल खेळविण्यासाठी एक चांगला पर्याय असेल असेही संकेत दिले आहेत.
करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर पडली. आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. सर्वच देशात करोनामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांत लॉकडाऊनही करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात तर सहा महिन्यांचा लॉकडाऊन असून ही मुदत 30 सप्टेंबरला संपत आहे. असे असले तरीही लगेच 18 ऑक्टोबरपासून विश्वकरंडक कसा काय खेळू शकतो अशी विचारणाही बीसीसीआयने केली आहे. तेथील सरकारने परदेशी व्यक्तींचे व्हिसा रद्द केले असून केवळ भारतीय संघासाठी नियमात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे.
केवळ भारतीय संघाने इथे मालिका खेळली तरच ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे करोनामुळे झालेले नुकसान काही अंशी भरुन निघेल. त्यासाठी लॉकडाऊन असतानाही भारतीय संघाला तेथे येण्यात कोणतीही अडचण येऊ देणार नाही असेही त्यांच्या मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीबाबत आयसीसी देखील लक्ष ठेवून आहे. येत्या काही दिवसांमध्ये परिस्थितीत सुधारणा झाली तरच विश्वकरंडक स्पर्धेचा विचार होऊ शकतो अन्यथा ही स्पर्धा लांबणीवर टाकली जाऊ शकते. या स्थितीत विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका मात्र खेळविण्यात येईल अशी दर्पोक्ती ऑस्ट्रेलिया मंडळाने केली आहे.
सध्याच्या घडीला परिस्थिती कधी सामान्य होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. पण करोनाचा पूर्ण नायनाट होण्यासाठी खूप काळ लागेल हे स्पष्ट दिसत आहे. अशा वेळी तिथे विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करणे अशक्य आहे, असे संकेत आयसीसीने दिले आहेत.
जर करोनामुळे विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकली गेली तर आयपीएल स्पर्धा त्या विंडोमध्ये घेता येइल का याचीही चाचपणी बीसीसीआय करत आहे. या सर्व गोष्टींवर येत्या काही दिवसात निर्णय घेतला जाईल असे ऑस्ट्रेलिया मंडळाने जाहीर केले आहे.