नवी दिल्ली :- भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने सिक्सरकिंग युवराज सिंगचे कौतुक केले आहे. 2011 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिन तेंडुलकर, विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांच्यासह माझीही सरस खेळी झाली होती.
मात्र, आमच्यापेक्षा जास्त वाटा युवराजचा होता. त्याच्या कामगिरीमुळेच भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. त्याने या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली व अंतिम लढतीतही त्याने अत्यंत जबाबदारीने धोनीला साथ देत विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र, त्याचे जीतके कौतुक होणे गरजेचे होते तीतके झाले नाही, अशी खंत गौतम गंभीरने व्यक्त केली आहे.
दरम्यान, भारताने 1983 सालानंतर 2011मध्ये विश्वचषक जिंकला होता. 2011 साली झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्डेडियमवर झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता.
भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने हा विश्वचषक गाजवला होता. या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत युवराज हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.