समान पाणीपुरवठा, एचसीएमटीआर, जायकाला “ब्रेक’
विकास प्रकल्पांचा खर्च आणखी वाढण्याची भीती
महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची किंमत 10 हजार कोटींच्या घरात
पुणे – थैमान घातलेल्या करोनाच्या साथीचा जबर फटका पुण्यालाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या तब्बल 10 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना “ब्रेक’ लागला आहे. त्यात काही योजनांचे काम सुरू होते, तर काही मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यात तर काही योजना निविदा प्रक्रियेत होत्या. त्यामुळे लॉकडाऊन निघाल्यानंतर या योजनांचे काम पुन्हा सुरू झाले, तरी या योजनांच्या वाढत्या खर्चाचा बोजा पालिकेस उचलावा लागणार आहे. दरम्यान, पालिकेचा बराचसा निधी करोना व्यवस्थापनात जाणार असल्याने या प्रकल्पांसाठी नवी दमडी मिळणेही कठीण होणार आहे.
मुळा- मुठा नदी संवर्धन योजना
मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जपानमधील “जायका’ कंपनीच्या मदतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. 2016 मध्ये केंद्राने या योजनेला मान्यता दिली असली, तरी अजूनही ही योजना निविदा प्रक्रियेतच आहे. त्यातही या कामाच्या निविदा 40 ते 60 टक्के जादा दराने आल्याने वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यामुळे फेरनिविदा काढून मार्चपासून हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही निविदा प्रक्रियाही अडकली आहे. या प्रकल्पाचा खर्च तब्बल 991 कोटी रुपये आहे.
“एचसीएमटीआर’ रस्ता
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात हा रस्ता पूर्णत: उन्नत (एलिव्हेटेड) प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच्या निविदा पालिकेने जुलै 2020 मध्ये मागविल्या होत्या. मात्र, त्या तब्बल 40 ते 50 टक्के जादा दराने आल्याने वादग्रस्त ठरल्या. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 7 हजार कोटींचा होता. मात्र, वाढीव निविदांमुळे तो 11 हजार कोटींच्या घरात गेला. परिणामी, या निविदा रद्द करून प्रशासनाने फेरनिविदा काढण्यास सुरूवात केली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही निविदा प्रक्रियाही रखडली असून यंदाच्या आर्थिक वर्षात हा प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे नाहीत.
भामा-आसखेड योजना
शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 394 कोटींची ही योजना प्रस्तावित आहे. 2013 मध्ये सुरू झालेल्या हे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, धरणग्रस्तांनी पुनर्वसनासाठी सुमारे 3 वर्षे या प्रकल्पाचे काम बंद पाडले. प्रशासनाने 31 मार्च 2020 पर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, लॉकडाऊन तसेच धरणग्रस्तांच्या भूमिकेमुळे हे काम आता आणखी रखडणार आहे.
समान पाणीपुरवठा
गेल्या 2 वर्षांपासून शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. सुमारे 2,521 कोटींची योजना आहे. त्यात 81 पाणी टाक्या उभारणे, 1,600 किलोमीटरची जलवाहिनी टाकणे तसेच 3 लाख नळ मीटर बसविण्यात येणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे काम फक्त 6 ते 8 टक्केच झाले आहे. या कामाने जानेवारी 2020 पासून गती पकडली असतानाच; लॉकडाऊनमुळे काम बंद पडले आहे. त्यात प्रामुख्याने टाक्या आणि नवीन जलवाहिनीसाठी खोदकामाचा समावेश आहे. आता लॉकडाऊन अंशत: शिथिल झाल्यानंतर पालिकेने या योजनेची कामे पुन्हा सुरू करण्याच निर्णय घेतला आहे. पण, त्यासाठी मजूर मिळत नसल्याने परिस्थिती पूर्ववत झाल्याशिवाय हे काम सुरू होण्यासाठी आणखी काही महिने जाणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय
शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्यासाठी डिसेंबर 2019 पासून ट्रस्ट स्थापना तसेच इतर मान्यतांच्या प्रक्रियेला वेग आला होता. हा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी होता. महाविद्यालयासाठी सुमारे 600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शहर पूर्वपदावर येण्यास आणखी काही महिने लागणार असल्याने हा प्रकल्पही रखडणार आहे.