सहा हजार नागरिकांचे स्थलांतर : पश्चिमेकडील शाळांना सुट्टी
सातारा – जिल्ह्याच्या पश्चिमेला बुधवारी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला असून पूरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. तर गुरूवारी देखील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कराड, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावली तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बाधित लोकांच्या मदतीसाठी प्रशासनाने पुणे येथे पाचारण केलेल्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या कराड व पाटण तालुक्यात अहोरात्र काम करत होत्या. जिल्ह्यात 90 गावे पुरग्रस्त झाली असून 5 गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील 4 हजार 258, पाटण तालुक्यातील 786, फलटण तालुक्यातील 549, सातारा तालुक्यातील 465, महाबळेश्वर तालुक्यातील 161 व जावली तालुक्यातील 43 असे एकूण 6 हजार 262 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आले आहे. ज्या गावांना पाण्याने वेढले आहे अशा गावांना प्राथमिकता देऊन तेथे एनडीआरफची टीम काम करीत आहे. सध्या एनडीआरएफची टीम कराड आणि पाटणमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर काम करीत आहे.
दरम्यान, नागरिकांना मदत लागल्यास त्यांनी आपत्ती व्यवस्थानाच्या 02162-232349 या क्रमांकावर संपर्क साधावा त्यांना मदत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, कराड व पाटण तालुक्यातील पुरपरिस्थिती व मदतकार्याची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाहणी केली. कराड शहर आणि तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे ही प्राथमिकता जिल्हा प्रशासनाची असेल.
शिंदे आळीतील गणपती बनविणाऱ्या कारागिरांचे जे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. त्याचबरोबर कराड तालुक्यातील इतर पूरग्रस्त गावातील नदीच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांना पूर येण्याची वाट न पाहता तत्काळ तात्पुरत्या निवाऱ्यात हलविण्याच्या सूचना प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पूरग्रस्तांना सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्याची सोय केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी काल उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी या पुरग्रस्तांना अन्न व पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.