शिवेंद्रसिंहराजेंनी केली पाहणी; तातडीने मदत करण्याची प्रशासनास सूचना
सातारा – मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जावळी तालुक्यातील नरफदेव येथे भुस्खलन झाल्याने मेरुलिंग डोंगरावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. या दुर्घटनेमुळे नरफदेवमधील 14 घरे बाधीत झाली असून या घरांवर डोंगराचा काही भाग कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे.
याची माहिती मिळताच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने नरफदेव येथे भेट दिली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बाधीत 14 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सुचना केली. तसेच या बाधीत कुटूंबांना स्वत: धान्य देण्याचे स्पष्ट करुन माळीणसारखा प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सुचना शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अशातच अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. नरफदेव येथे भुस्खलन झाले असून मेरुलिंग डोगरावर भेगा पडल्या आहेत. खचलेला डोंगराचा भाग नरफदेव गावावर कोसळण्याची भिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांना कळवले. शिवेंद्रसिंहराजे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
यावेळी जावली पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गिरी, सरपंच सौ. शीतल साखरे, उपसरपंच वसंत साबळे, मंडाधिकारी अब्दुल शेख, तलाठी एस. एम. आंबवणे, ग्रामसेवक एस. बी. गायकवाड, सुनिल साबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.