सौ. कल्याणी वाघमोडे यांची माहिती
फलटण – लवकरच सरकारने अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात अन्यथा सकल धनगर समाजाच्यावतीने 13 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहितीही सौ. वाघमोडे यांनी दिली. फलटण येथील माळजाई मंदिर येथे समस्त सकल धनगर समाज बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत त्या बोलत होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा निहाय धनगर समाजाच्या चिंतन बैठकांच्या आयोजनाचा धडाका चालू असून आजपर्यंत जालना, पुणे, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या ठिकाणी बैठका झाल्या आहेत. घटनेप्रमाणे असलेले अनुसूचित जमातीचे धनगर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अशा प्रकारची सरकारने व राजकीय नेत्यांनी केलेली आश्वासने हवेतच विरली की काय? असा सवाल सकल धनगर समाजाच्या सौ. कल्याणी वाघमोडे यांनी सरकारला विचारला आहे.
या बैठकीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन प्रा. बिरदेव बुरूंगले, फलटण पं. स. माजी सभापती शंकरराव माडकर, रामभाऊ ढेकळे, श्रीराम सहकारी साखर काखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके, बजरंग गावडे, दादासाहेब चोरमले, सुभाषराव सोनवलकर, सांगळे अण्णा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कल्याणीताईं वाघमोडे म्हणाल्या, गेल्या 70 वर्षांपासून धनगर आरक्षणाचे भिजतं घोंगडं राज्य सरकारला सोडवता आलेले नाही. आघाडी सरकारच्या काळातही फक्त मतांच्या भांडवलासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उठवला गेला, परंतु प्रत्यक्षात उत्तर मिळवता आले नाही. जुलै 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बारामती येथे झालेल्या आंदोलनात एकवटला होता, त्यावेळी उपोषण सोडते दरम्यान आजचे मुख्यमंत्री व त्यावेळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.
बजरंग खटके, प्रा. भिमदेव बुरूंगले, बजरंग गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला राजकुमार गोफणे, आप्पासो वाघमोडे, पै. विष्णू लोखंडे, रमेश धायगुडे, नारायण काळे, दादासो महानवर, प्राचार्य दत्ता भिवरकर, फलटण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, मारूतराव भिवरकर, संदीप चोरमले, खंडेराव भिसे तसेच समाज बांधव उपस्थित होते.