इम्फाळ – अद्यापही मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी रात्री अनेक जिल्ह्यांत शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी मशाल मोर्चा काढला.
इम्फाळच्या पूर्व-पश्चिम, थौबल आणि काकचिंग जिल्ह्यात महिलांनी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत रस्त्यावर एकत्र येऊन रॅली काढल्या. यावेळी महिलांच्या हातात मशाली होत्या, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
मीरा पायबीच्या नेत्या थौनाओजम किरण देवी यांनी सांगितले की, आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारबद्दल खूप निराश आहोत. हिंसाचार थांबवण्यात आणि नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात ते अपयशी ठरले आहेत. म्यानमारमधून होणाऱ्या अवैध स्थलांतरितांच्या घुसखोरीविरोधातही रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी निदर्शने केली. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्याची मागणी करत महिलांनी घोषणाबाजी केली.
#WATCH | Manipur: Security deployment for Imphal East is done in two layers of security, one at the city town area and the other at the foothill areas. CRPF has been deployed for foothill areas and Manipur Police is deployed in sensitive areas with CRPF under the supervision of… pic.twitter.com/oXt8FWTJMx
— ANI (@ANI) June 18, 2023
दरम्यान, एका महिन्यांपासून मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अफवा पसरू नये म्हणून राज्य सरकारने 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती आणि इंटरनेट सेवांवर बंदी घातली होती.
दरम्यान, हिंसाचाराच्या विळख्यात होरपळत असलेल्या मणिपूरचे सर्वपक्षीय नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अद्यापही भेट दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मणिपूरमधील दहा प्रमुख विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत आले आहेत. यात टीएमसी, आप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सीपीएम, सीपीआय या पक्षांचा समावेश आहे.
या सर्वांनी पंतप्रधानांना भेटीची वेळ मागितली आहे परंतु त्यांना भेटीची वेळ मिळालेली नाही. याबद्दल आज कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली. मन की बात करण्याऐवजी मणिपूर की बात करा, असा सल्ला खर्गे यांनी दिला आहे.