पुणे – शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये सातत्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, या सर्वच घटना दाट लोकवस्ती किंवा व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या भागांतील आहेत. पण, अशा घटना टाळण्यासाठी कोणतीही ठोस अशी नियमावली पालिकेकडे नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. घटनेनंतर फक्त धावपळ करायची…कागद फिरवायचे आणि फतवे काढायचे, इतकेच काय ते “कर्तव्य’ पालिका बजावत आहे.
शहरात आगीच्या घटना वारंवार घडत असताना पालिका प्रशासन दरवेळी जबाबदारी ढकलून मोकळे होते आहे. शहर आणि लगतच्या हद्दीत प्रामुख्याने कोंढवा, उंड्री, हडपसर, नगर रस्ता, टिंबर मार्केट, मार्केट यार्ड अशा प्रमुख परिसरांत अनेक व्यापाऱ्यांचे गोडाऊन आहेत. हे सर्व परिसर दाटीवाटीचे असून,येथे एकमेकांना अगदी चिकटून गोडाऊन उभे केले गेले आहेत. त्यांना कोणतीही परवानगी नाही. किंवा पालिका प्रशासन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. ना की, त्यांचे ऑडिट केले जाते.
टिंबर मार्केट आणि आता गंगाधाम येथील आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अन्यथा हे प्रकरण पालिका प्रशासनावर चांगलेच शेकले असते. शहरातील हॉटेल, हॉस्पिटल्स, शाळांना पालिका प्रशासन अग्निशमन दलाची “एनओसी’ बंधनकारक करते. त्यात त्रुटी आढळल्यास कायदेशीर कारवाईदेखील करते. मात्र, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या गोडाऊन्सबद्दल कोणतीही भूमिका घेत नाही, हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखे आहे.
महापालिकेची भूमिका काय?
“शहरातील गोडाऊनबाबत कोणतीही नियमावली नाही. यामुळे त्यांचे सेफ्टी ऑडिट आणि फायर ऑडिट होत नाही. त्यांना ते लागूही करता येत नाही. त्यांना ते लागू करायचे असेल, तर महापालिकेला गोडाऊन नियमित करुन अधिकृत करावी लागतात. मात्र, शहरातील एकही गोडाऊन महापालिकेकडून नियमित केले गेलेले नाही. शॉप ऍक्ट परवाना घेऊन गोडाऊन सुरू केली जातात. यामुळे शहरात दाट लोकवस्तीत वसलेल्या गोडाऊनमध्ये आगीवर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही स्वत:ची यंत्रणा नाही.
यातील एका एका गोडाऊनमधून दिवसाला लाखो रुपयांचा व्यवसाय होत असतो. मात्र त्यांच्याकडे साधे आग नियंत्रणाचे हजार-दोन हजार रुपयांची अग्निरोधक यंत्रणादेखील नाही. टिंबर मार्केटमध्ये आग लागली तेव्हाही हीच परिस्थिती होती,’ ही बाब अग्निशमन दलाच्या जवानांनी निदर्शनास आणून दिली.
ही गोडाऊन जळून
आगीमध्ये सिमेंट, मांडव साहित्य, कपडे, साबण, ऑइल पेंट, काच, रबर, वायरिंग, ऑटोमोबाइल, बिस्कीटची सुमारे 25 गोडाऊन जळून खाक झाली. यामध्ये एक मांडव आणि डेकोरेशन साहित्याचे गोडाऊन होते. तेथील आग भडकली होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला मोठे कष्ट घ्यावे लागले. बंब घटनास्थळी जाण्यासाठी सुदैवाने पुरेशी जागा होती. यामुळे मदतकार्य वेगाने करता आले. गोडाऊन शेजारीच ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय आहे. तेथील ट्रक हटवल्यावर अग्निशमन दलाचे बंब आत पाठवून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. धुराचे लोट परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
बहुतांश गोडाऊन बेकायदा
गंगाधाम येथील आगीनंतर बेकायदा गोडाऊनचा मुद्दा चर्चेत आला आहे. यात प्रामुख्याने हे गोडाऊन्स पत्र्याचे शेड उभारून, दाटीवाटीच्या वस्तीत आहेत. त्यांना कोणतीही परवानगी मिळालेली नाही. तरीही, चिरीमिरी देऊन ही “दुकाने’ उभी केली जात आहेत. यामुळे मोठे नुकसान प्रामाणिक व्यक्तींना सहन करावे लागत आहे.