नाणे मावळ – राज्यात बहुतांश भागात वादळी पाऊस झाल्याचा परिणाम नाणे मावळातील वातावरणावर झाला होताना दिसत आहे. नाणे मावळच्या किमान तापमानात घट होत बुधवारी (दि. 8) तापमान घसरले. त्यामुळे थंडीच्या कडाक्याबरोबरच सकाळी नऊवाजेपर्यंत दाट धुके नागरिकांनी अनुभवले.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास हवेतील गारव्यामुळे नाणे मावळ व कामशेत शहरात पहाटेच्या वेळी दाट धुके पसरले होते. सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान धुक्याचे प्रमाण वाढत गेले. या धुक्यात रेल्वे तसेच रस्ते वाहतूक मंद झाली होती. पशू, पक्षी यांचीही वाट काही काळ हरवली असल्याचे पाहायला मिळाले. या परिसराला आज जणू काही महाबळेश्वराचे स्वरूप आले होते. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला. नाणे मावळात पहाटे धुके, तर दिवसभर गारठा जाणवत होता. दक्षता म्हणून मोटारी, वाहनांचे दिवे व लाल रंगांचे इंडिकेटर लावून चालविल्या जात होत्या. वाहनचालकही धिम्या गतीने गाडी चालवत होते.
गेल्या काही दिवसांपासून दिवसभर ऊन, तर संध्याकाळी थंडी जाणवत होती. त्याचा परिणाम जनजीवनावरही होऊ लागला आहे. बाजारपेठही सकाळी उशिरा खुल्या होत आहेत. सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही थंडीची हुडहुडी जाणवू लागली आहे. सकाळी शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना धुक्यातून वाट काढत शाळा गाठावी लागली. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी कपाटात ठेवलेली स्वेटर, मफलर, जर्किंग, शाल, कानटोप्या, हातमोजे बाहेर काढले आहे. नवीन उबदार कपड्यांची विक्रीसाठी दुकाने सज्ज झाली आहे. गारठा वाढू लागल्याने शेकोट्याही पेटविल्या जात आहेत. चहाच्या केंद्रांवर चहाप्रेमींची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धुके व ढगाळ वातावरण यामुळे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सूर्यदर्शन झाले. धुक्यामुळे बाजारपेठेतील व्यवहारही उशिराने सुरू झाले.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
अगोदर अवकाळी पाऊस नंतर ढगाळ हवामान आणि आता दाट धुके यामुळे शेतातील उभ्या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस जास्त काळ रेंगाळल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बी हंगामातील पेरण्याही उशिराने झाल्या. आता रब्बी हंगामातील पिकावर त्याचा दुष्परिणाम होऊन वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात मात्र वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याशिवाय प्रामुख्याने मका, वाटाणा, मसूर, हरभरा, गहू व अन्य कडधान्य धोक्यात आली आहे. एकंदरीतच हा हंगाम पिकांवर रोगराईच्या संकटात सापडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.