पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला
मुंबई – कोल्हापूर, सांगली, कोकण यासह राज्याच्या अनेक भागात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता, तिथे मदत आणि पुनर्वसन कामात सरकारी अधिकारी व्यस्त असतील. हे काम लवकर पूर्ण होईल, असे दिसत नाही.
त्याला वेळ लागेल. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर त्याचा ताण पडेल. त्यामुळे ही एकूण परिस्थिती लक्षात घेत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. या निवडणूका पुढच्या वर्षी घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे. चार दिवसांनी सरकारला जाग आली आहे. यात्रा आणि पक्षप्रवेशामधून त्यांना वेळ नाही. भाजपला जनतेशी काही देणे-घेणे नाही. भाजप काय, शिवसेना काय, दोन्ही पक्ष राजकारण करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील काल म्हणाले की, पाऊस किती पडेल आणि पाणी भरेल याचा अंदाज नव्हता. अशा परिस्थितीत तुम्हाला 220-225 आकड्यांचा अंदाज येतो, आमदार निवडून येण्याचा अंदाज येतो. मग एवढा पाऊस पडतो, पाणी भरतंय याचा अंदाज येत नाही, असा उपहासात्मक प्रश्नही त्यांनी विचारला.
पूरपरिस्थिती पहिल्यांदा भारतीय लष्कराने हाताळायला हवी होती. परंतु यांच्या यात्रा सुरु होत्या, राजकारणातून वेळ मिळत नव्हता. चार दिवसांनंतर तिथे जाता. अलमट्टी धरणातून पाणी सोडले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. फक्त राजकारण करत बसायचं, मग यात्रा, पक्षप्रवेश करायचे, यातच त्याचा वेळ जात आहे. त्यामुळे कोण जगलं काय, कोण मेलं काय त्यांना काहीच फरक पडत नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.