-दत्तात्रय आंबुलकर
शैक्षणिकदृष्ट्या केमिकल इंजिनिअर असणाऱ्या बंगळुरूच्या निवेधा या महिला युवा इंजिनिअरने कचऱ्यावर फेरप्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासह अनेकांना रोजगार-कमाईची वाट दाखविण्याचे विशेष उल्लेखनीय काम केले आहे.
निवेधाने कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीसह नागरी व आरोग्यविषयक समस्या-आजार यांचा अभ्यास केला व या समस्येतून समाजाच्या सोडवणुकीलाच प्राधान्य देण्याचे निश्चित केले. त्याआधी सार्वजनिक- नागरी कचऱ्याचे “ओला कचरा-सुका कचरा’ असे परंपरागत व सहज सुलभ वर्गीकरण तर सर्वदूर होत होते. मात्र, या वेगळ्या केलेल्या कचऱ्यातून अल्पावधीतच दुर्गंधी निर्माण होत असल्याने त्यावर त्वरित प्रक्रिया करण्याची गरज निवेधाला प्रकर्षाने जाणवली व त्यांनी कचऱ्याचे केवळ वर्गीकरणच नव्हे तर त्यावर फेर प्रक्रिया करणारे “वेस्ट सॅग्रीगेटर ट्रशपॉट’ हे छोटेखानी मशीन तयार करून त्याच्या यशस्वी प्रयोगासह सुरुवात केली.
निवेधाच्या या शास्त्रोक्त प्रयत्न आणि उपक्रमाला सक्रिय साथ लाभली ती राजस्थानमधील सौरभ जैन या युवा तंत्रज्ञाची. निवेधाचे प्रयत्न आणि सातत्य पाहून यशस्वीपणे चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या सौरभ जैनने लाखो रुपयांची नोकरी धुडकावून निवेधाच्या कचरा निर्मूलन मोहिमेला वाहून घेतले. त्यामुळे या प्रयत्नांना अर्थातच मोठे पाठबळ लाभले.
आज “वेस्ट सॅग्रीगेटकर- ट्रॅशपॉट’ मशिनरी संकल्पनेच्या सर्वाधिकारांसह असणारे पेटंट निवेधाजवळ आहे. आपल्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात निवेधाला घरोघर जाऊन लोकांना सुका व ओला कचरा कसा गोळा करावा हे सांगावे लागले व त्यासाठी लोकांना सातत्याने कृतिशील मार्गदर्शन करावे लागले. त्यांच्या या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद मिळू लागला. मात्र, त्यांच्या मित्रमंडळात निवेधाला “कचरावाली’ असे म्हटले जाऊ लागले. मात्र, त्यांनी आपले ध्येय आणि प्रयत्न सोडले नाहीत.
सौरभ जैन यांची साथ लाभल्याने निवेधा आज कचऱ्याची ट्रेशबॉट तयार करणाऱ्या ट्रेशकॉन लॅब्ज प्रा. लिमिटेड या कंपनीची संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बनली आहे. त्यांनी बनविलेल्या कचऱ्याचे विभाजन व फेरप्रक्रिया करणाऱ्या ट्रॅशबॉटचा वापर बंगळुरू व कर्नाटकाशिवाय तामिळनाडू व गुजरातपर्यंत केला जात आहे. त्यांच्या ट्रॅशबॉटचा वापर नजीकच्या भविष्यात अयोध्येपासून नेपाळ, सिंगापूर, मलेशिया इ. देशांमध्ये होणार आहे.
एका ट्रॅशबॉटद्वारा 6 लोकांना कचरा प्रक्रियेचा रोजगार मिळत असून अशा प्रकारे कचऱ्यातून केवळ रोजगार व उत्पन्नच नव्हे तर समृद्धी प्राप्त करण्याचे महनीय काम केले गेले आहे.