सातारा – सातारा जिल्हा परिषदेचा देशभरात नावलौकिक असून तो कायम ठेवत जिल्हा परिषदेच्या परंपरेला साजेसे काम करणार आहे. ग्रामीण भागात विकासकामांबरोबर विविध योजनांना प्राधान्य देऊन सर्वांशी समन्वय ठेवून काम करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची बुधवारी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर पुणे येथील सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती झाली. गुरुवारी दुपारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी विनय गौडा यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी खिलारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, किरण सायमोते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. खिलारी म्हणाले, “सातारा जिल्हा परिषद ही पंचायतराजची प्रयोगशाळा असून देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरवलेली जिल्हा परिषद आहे. अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याचे निश्चितच समाधान आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेतील कामाचा अनुभव नसला तरी सर्वांशी समन्वय साधून ग्रामीण भागाच्या विकासावर भर देणार आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने विकासकामे करण्यावर आपला भर राहणार असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. कारभार गतीने होण्यासाठी आयटी, संगणकाच्या वापरावर भर देऊन आधुनिकतेला प्राधान्य देणार आहे.” विनय गौडा यांनी करोना काळात चांगले काम केले. विविध उपक्रम, योजनांना त्यांनी प्राधान्य दिले. आपल्या कार्यकालातही प्रशासनात आणखी गतीमानता आणणार असल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री. खिलारी व श्री. गौडा यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्हा परिषदेला गौरवशाली इतिहास असून हा लौकिक कायम ठेवत विविध उपक्रम राबवून सर्वसामान्यांसाठी प्रशासन काम करेल. नागरिकांनी सुचवलेले उपक्रम, मागण्यांना प्राधान्य देणार आहे. जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांशी समन्वय साधून जिल्ह्याचा विकास साधण्यावर आपला भर राहणार आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी (मुख्य कार्यकारी अधिकारी)