मुंबई : सध्या देशात करोनाच्या रुग्णसंख्येने केंद्राच्या चिंतेत भर घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेत संबंधित सर्व राज्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सांधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी, “महाराष्ट्रात सध्या करोना रुग्णसंख्या कमी असून राज्य रुग्णसंख्येच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम आहे,” असे म्हटले.
“सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल आणि आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र नागरिकांनी मास्क वापरावा,” असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसंच भविष्यात करोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.