औरंगाबाद – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमागे काही सहकारी असल्याचे सूचित करणारा दावा केला. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. प्रामुख्याने गायरान जमीन वाद, टीईटी घोटाळ्यावरून सत्तार आरोपांच्या घेऱ्यात आले. त्यावरून नुकत्याच समाप्त झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला.
आता सत्तार यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी राजकीय सनसनाटी निर्माण करणारी भूमिका मांडली. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले. मी मंत्री नसतानाच्या काळातील निर्णयांसाठीही मला जबाबदार धरले जात आहे.
मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामागे माझ्या पक्षातील काही लोक असू शकतात. विरोधी पक्षांतील माझे हितचिंतकही त्यामागे असू शकतात, असे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्या बैठकीत काय झाले ते बाहेर आले. त्यामुळे आपल्यातील खासगी गोष्टी कोणीतरी बाहेर पुरवत असल्याचे मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. तसेच, चौकशीची मागणीही केली, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाला. शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मात्र, बराच काळापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे अधूनमधून समोर येत असते. आता सत्तार यांनी केलेल्या दाव्यामुळे त्या गटातील कुरबुरी पुढे आल्या आहेत. सत्तारांच्या या वक्तव्यावरून आता शिंदे गट फुटणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.