संतोष वळसे पाटील
मंचर – सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यामध्ये सत्येत असणारी महायुती तर विरोधात असणारी महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दोन्हीकडे राजकीय नेते राजकीय डावपेचामध्येच गुंतलेले पाहावयास मिळत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अडगळीत पडले आहे.
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर कांद्याचे अनुदान जमा होईल, अशी घोषणा केली होती; परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानापोटी मिळणारी रक्कम जमा न झाल्याने शेतकरी नाराज असून राजकीय नेते हे सध्या राजकीय डावपेचातच गर्क आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची विक्री मार्केटला केली आहे. त्या शेतकऱ्यांचे प्रतिकिलो साडेतीन रुपये या दराने सरकारने अनुदान जाहीर केले होते.
या अनुदान प्राप्त शेतकऱ्यांची यादीही सरकारने प्रसिद्ध केली होती; परंतु हे अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे अनुदान 15 ऑगस्टपर्यंत मिळेल असे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सत्ताधारी आणि विरोधक राजकीय नेते राजकीय डावपेचांमध्येच गुंतलेले आहेत, विरोधीपक्षांबरोबर सत्तेत असणारे पक्ष ही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. जाहीर केलेले अनुदान कधी मिळणार हा प्रश्न मात्र सर्वसामान्य शेतकरी विचार करीत आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीची जाणीव नाही
सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक गावांमध्ये चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला असून चारा छावण्यांची उभारणी करणे ही गरजेचे आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असताना शेतकरी वर्ग अडचणीत असताना सरकार मात्र याकडे पूर्णपणे डोळे झाक करत आहे. अडचणीत आलेला शेतकरी अजूनच अडचणीत जात आहे. सत्तेतील सरकार आणि विरोधी पक्ष दोन्हीही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून राजकीय डावपेचातात गुंतल्याचे सध्या दिसून येत आहे.