पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालाच्या फॉर्म्युल्याबाबत शिक्षण विभागाचे बैठकांचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. सीबीएसईच्या फॉर्म्युल्यातील काही निकषांची “कॉपी’ करून बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, फॉर्म्युलाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षण यांच्यात उत्सुकता निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी शासनाने विद्या प्राधिकरणातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. तज्ज्ञांनी दिवस-रात्र अभ्यास करून सविस्तर आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांची, तज्ज्ञ, प्राचार्य यांच्या टप्प्याटप्प्याने सहा ऑनलाइन बैठका झाल्या आहेत. त्यातील चर्चेनुसार आराखड्यात बदलही केले जात आहेत.
आज पुन्हा बैठक
बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी शनिवारी पुन्हा शिक्षणमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य यांची ऑनलाइन बैठक होणार आहे. यात सीबीएसईच्या आराखड्यातील काही बाबींचा अवलंब महाराष्ट्र बोर्डाला करता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे. काही नवीन निकषांचाही समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.