मुंबई : मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर भालके यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी देण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर धरत आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पार्थला संधी देण्याची मागणी केली आहे.
अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याविषयीचे पत्र लिहिले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण व्हायला हवे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली.
दरम्यान, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचं पुनर्वसन केलं जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा 27 नोव्हेंबरला मध्यरात्री मृत्यू झाला होता. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत भालके यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.