पुणे – ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील रुग्णालयात 18 रुग्णांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. अशाप्रकारे रुग्णांच्या जीवाची झालेली हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल मागवला असून, दोषींवर त्वरित कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी पुण्यात दिली.
ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमके काय घडले आहे हे समजून घेतले जाईल. त्यांचा अहवाल दोन दिवसांत मागवला आहे. तो मिळाला की दोषींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत ठाण्यातील सदर रुग्णालय येते; परंतु मृत्यू हा मृत्यूच असतो. रुग्णाच्या जीवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झाले तरी खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.
या ठिकाणी काय घडले त्याची माहिती आम्ही घेत आहोत. या रुग्णालयाच्या अधीक्षकांना याची कल्पना असेल. रुग्णांकडे दुर्लक्ष झाले आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडणे सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड करणे हे माझ्यासारखा मंत्री सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल.