श्रीगोंदा -विसापूर कालव्याला तत्काळ आवर्तन सोडण्याच्या आश्वासन आणि आवर्तनाचे लेखी नियोजन देण्यात आल्यानंतर शेतकरी बचाव कृती समितीचे वडाळी (ता. श्रीगोंदा) येथील आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती राजेंद्र काकडे यांनी दिली.
विसापूर कालव्याला तत्काळ आवर्तन सोडण्यात यावे, कुकडीच्या आवर्तनाचे लेखी नियोजन द्यावे, आणि फळबागांना पाणी द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वडाळी येथील कालव्यात आंदोलन करण्यात आले. याबाबत माहिती देताना काकडे म्हणाले, कुकडीचे उपअभियंता दिलीप साठे यांनी विसापूर कालव्याचे आवर्तन सोमवारी सायंकाळी सोडण्याचे आश्वासन दिले. आवर्तनाचे लेखी नियोजन दिले जाणार आहे. त्याचबरोबर कुकडीच्या कालव्यावरील उचल पाण्याचे पाईप काढण्यात आल्याने जवळपास एमसीएफटी पाण्याचा अपव्यय रोखला जाणार आहे.
यामुळे बचत होणाऱ्या पाण्याचा उपयोग कुकडीच्या आवर्तनातून फळबागांना देखील पाणी देण्याची मागणी साठे यांच्याकडे केली असल्याचे सांगत मागण्या मान्य केल्याने आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे राजेंद्र काकडे यांनी सांगितले आहे.
या आंदोलनात काकडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस, राष्ट्रवादीचे ऋषिकेश गायकवाड, चंदू वाजे, निलेश शेलार आदी सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आंदोलक शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले.