कोपरगाव -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मागील दोन महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र लॉकडाऊन अटी शिथिल केल्यानंतर करोना हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रांतून अनेक नागरिक कोपरगाव तालुक्यात आले. त्यामुळे तालुक्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे यापुढे एकासही करोनाची बाधा होवू नये, यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
मागील आठवड्यात कोपरगाव शहरातील महिला डॉक्टरसह ठाणे येथून आजोबांसमवेत धोत्रे येथे आलेल्या दोन बहिणींपैकी एकीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते आदी प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासनाने केलेल्या कडक उपाययोजनांमुळे कोपरगाव तालुक्याची परिस्थिती चांगली होती. लॉकडाऊनदरम्यान बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येत होते. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देखील बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामुळे या नागरिकांचा पोलीस प्रशासनाशी वाद होत आहे. अशा प्रकारचे वादविवाद टाळून नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे.
कोपरगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या अटी जरी शिथिल केल्या असल्या, तरी उतावीळपणा अंगलट येवून त्याचे विपरित परिणाम भोगावे लागू शकतात, याची जाणीव ठेवून नागरिकांनी योग्य काळजी घेण्याच्या सूचना करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आ. काळे यांनी केले. तसेच धोत्रे येथे व कोपरगाव शहरातील बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात काय काय उपाययोजना केल्या आहेत व अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यासाठी काही अडचणी येत असल्यास त्याठिकाणी अजून काही उपाययोजना करता येऊ शकतात का, याचा आढावा या बैठकीत आ. काळे यांनी घेतला.