पिंपरी – करोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात थोडीशी शिथिलता येताच बिनकामी रस्त्यावर उतरून फेरफटके मारणाऱ्या टवाळखोरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शहरातील रस्ते, भाजीबाजार आणि उघडलेल्या दुकानांसमोरील गर्दी वाढल्यामुळे “करोना’चा धोका आणखी तीव्र झाला आहे. नागरिक नियम तोडू लागल्याने करोना भोवण्याची शक्यता बळावली आहे.
एप्रिल महिन्यात अत्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र 3 मे नंतर जाहीर झालेल्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली. याचाच गैरफायदा काही ठराविक टवाळखोर नागरिकांकडून उचलला जात असल्याचे समोर येत आहे. दारू, किराणा, भाजीपाला, औषधांच्या नावाखाली हजारो नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. त्यातच पोलिसांचाही कडा पहारा काही अंशी शिथिल झाल्याने रस्त्यावर उतरणारांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
दुकानदारांसमोरील गर्दीही आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र असून स्वयंशिस्त पाळण्याऐवजी ती तोडण्यावरच अनेकांचा भर असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका प्रामाणिकपणे लॉकडाऊन आणि स्वयंशिस्त पाळणाऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवार दि. 18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रोज किमान दहा रुग्णांची भर पडत आहे. चौथ्या टप्प्यात स्वयंशिस्त न पाळणाऱ्यांवर कडक निर्बंध लादून कायदेशीर कारवाई न केल्यास रुग्णांचा वेग वाढण्याची शक्यता आहे.