नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीची अद्याप घोषणाही झाली नसली तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि केंद्रात कोणाचे सरकार येणार याची नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. लोकसभेच्या जागांचा विचार केला तर उत्तर प्रदेश हे देशातील सगळ्यांत मोठे राज्य आहे.
या राज्यातून ८० खासदार दिल्लीला पाठवले जातात. उत्तर प्रदेशात ज्या पक्षाला लीड मिळतो त्याच पक्षाची दिल्लीत सत्ता येते असे म्हणतात. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आणि कॉंग्रेसचा समावेश असलेली इंडिया या दोन्ही आघाड्यांनी उत्तर प्रदेशवरच आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे.
अशातच जनमताचा कानोसा घेण्यासाठी इंडिया टुडे आणि सी वोटर यांच्याकडून एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच मोठा पक्ष ठरणार असल्याचा कौल मिळतो आहे. भाजपला जवळपास ७० जागा मिळतील आणि त्यांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही ५० टक्क्यांपेक्षाही अधिक असेल असा अनुमान या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलला दोन जागा मिळाल्या होत्या. अपना दलला आताही दोन जागा मिळण्याचा अनुमान आहे. सर्वेक्षणात ३५ हजार जणांनी भाग घेतला होता. १५ जानेवारी ते २८ जानेवारी या काळात सर्वेक्षण करण्यात आले आहे.
बिहारमध्ये मात्र जागा कमी होणार
इंडिया टुडे आणि सी वोटरकडून बिहार या राज्यातही सर्वेक्षण करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारल्यामुळे व ते भारतीय जनता पार्टीसोबत आल्यामुळे या राज्यात त्याला कसा प्रतिसाद मिळतो याचीही चाचपणी या निमित्ताने करण्यात आली.
मात्र नितीश यांनी भाजप सोबत येण्याचा दोघांनाही फटका बसणार असल्याचे अनुमान आहे. बिहारच्या ४० जागांपैकी ३२ जागांवर भाजप- नितीश यांना विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या युतीला किंवा एनडीएला ३९ जागा मिळाल्या होत्या.
याचा अर्थ त्यांच्या सात जागा आता कमी होणार आहेत. इंडिया आघाडीतील लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. भाजप आणि एनडीएच्या मतांच्या टक्केवारीतही यंदा घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.