सातारा (प्रतिनिधी) – लोकसभेची निवडणूक लागल्यावर सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार लवकर ठरत नव्हता. मात्र, शेवटी उमेदवार ठरले आणि निवडणुकीची रणधुमाळीही सुरु झाली. अर्ज भरण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची राळही उडवली गेली. यामध्ये विकास फक्त दोन्ही बाजूंकडून प्रसिध्द झालेल्या जाहिरानाम्यांमध्येच दिसून आला.
प्रत्यक्षात एकमेकांची दुणी काढत असतानाच महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पायाला भिंगरी बांधावी लागली. शक्य तितक्या गावांमध्ये जात मतदारांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनीही झाला. शेवटी मंगळवारी प्रत्यक्षात 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 91 हजार 869 एवढ्या मतदारांनी मतदान केल्यानंतर आता उमेदवारांचे राजकीय भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आता चार जूनच्या निकालाची प्रतिक्षा व उत्सुकता सर्वांनाच आहे.
सातारा जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर तो आता राष्ट्रवादीतील कोणत्या गटाचा बालेकिल्ला होणार हे सिध्द होणार होते. मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला निवडणूक लढण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे भवितव्य या निवडणुकीच्या निमित्ताने ठरणार आहे.
वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सातारा हा बालेकिल्ला असताना खासदार म्हणून काम करण्याची संधी एकदा कै. लक्ष्मणराव पाटील यांना सोडता अधिकतर उदयनराजे भोसले यांनाच मिळाली होती. मात्र, 2019 मध्ये त्यांनी चांगल्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आल्यानंतर देखील राजीनामा दिला होता.
त्यावेळी पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळवून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून खा. श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा लाखभराच्या आसपास मताधिक्य घेत पराभव केला होता.
हा पराभव उदयनराजे भोसले यांच्यासह भाजपच्याही जिव्हारी लागलेला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होवून देखील हा पराभव झाला होता. त्यामुळेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिध्द झाले होते.
त्यानंतर भाजपने उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेवून खासदार म्हणून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. यानंतर 2019 ते 2024 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडमोडी घडून गेल्या होत्या.
त्याचे राजकीय पडसाद प्रत्येक मराठी मनांवर उमटलेले आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील फुटीला तोंड द्यावे लागले होते. या घडामोडींमध्ये भाजपने ज्या पध्दतीने फोडाफोडी केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आणि काही महिन्यातच राष्ट्रवादी फोडून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री या फोडाफोडीच्या राजकारणाने दिले होते. तर एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते.
विकासाच्या अनेक घोषणा महायुतीच्या सरकारने केल्या होत्या. मात्र, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने जनता हैराण झाली याकडे लक्ष नव्हते. महागाईचा मुद्दा गंंभीर असताना त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नसताना लोकसभेची निवडणूक लागली.
राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने एकजूट करत राज्यात सगळ्या जागांवर उभे केले अनेक ठिकाणी रुसवे फुगवे झालेले असले तरी निवडणुकीचे रण पेटत असताना सातारा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे तर महायुतीकडून उदयनराजे भोसले यांच्या चुरशीची लढत झाली.
शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीत हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा करण्यात आलेला आरोप हा त्यांच्यासाठी धोकादायक ठरु शकतो असे वाटत असतानाच खुद्द शरद पवार यांनी तो फेटाळून लावत शशिकांत शिंदे यांची पाठराखण केली.
तरी तो मुद्दा ऐरणीवर आलाच होता. महायुती व महाविकास आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शने झाली. दिग्गजांच्या सभांनी मोठे घमासान झाले आणि शेवटी दि. 7 रोजी मतदान झाले आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले.
निकालावर लागल्या पैजा
सातारची निवडणूक ही तुल्यबळ होती. उदयनराजे भोसले यांचे छ. शिवाजी महाराजांच्या गादीचे थेट वंशज म्हणून प्राबल्य आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शशिकांत शिंदे हे देखील जिल्हाभर संपर्क असलेले नेते म्हणून प्रसिध्द आहेत. निवडणूक कालावधी व निवडणुकीनंतर सातार्यात कोण बाजी मारणार याबाबत सोशल मिडियासह वैयक्तिक स्वरुपात पैजा लागलेल्या आहेत.
दोन्हीकडे समर्थक आमचाच नेता विजयी होणार म्हणून ठाम आहेत. मात्र, या सगळ्यात प्रचाराची पातळी संयमितपणे राखली गेली आहे हेही विशेष असून निवडणूक शांततेत पार पडली असून खिलाडूपणे सुरु असलेल्या पैजांचा विषय निकालापर्यंत सुरुच राहणार आहे.
कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण
या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीकडून पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, रिपाइं व अन्य पक्षांच्या नेते, पदाधिकार्यांनी उदयनराजे भोसले यांच्यासाठी प्रचारयंत्रणा राबवली.
तर महाविकास आघाडीकडून आ. बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह शिवसेना, रिपाइंचा अन्य गटासह अन्य पक्षांच्या नेते, पदाधिकार्यांसह माथाडी कामगारांनी प्रचार यंत्रणा राबवली. मात्र, प्रचारात महायुतीसह महाविकास आघाडीने कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटणवर जोर लावला होता. त्यामुळे हे मतसंघ या निवडणुकीत विजयाची भूमिका निभावणार असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात 63.07 टक्के मतदान
गतवेळीपेक्षा मतदानाचा टक्का घसरला असला तरी भर उन्हात नागरिकांनी या निवडणुकीसाठी केलेले मतदार 63.07 टक्के एवढे झाले आहे. यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.51 टक्के एवढे जास्त मतदान झाले असून त्या खालोखाल कराड उत्तर 65.33 व कराड दक्षिण 65.68 ही आकडेवारीही महत्वाची आहे.
तर सातारा जावली विधानसभा मतदारसंघात 62.77 टक्के तर वाई मतदार संघात 60.68 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पाटण कमी म्हणजे 56.50 टक्के एवढे मतदार झालेले आहे.
मताधिक्याची चर्चाही सुरु
या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीकडून मताधिक्याची चर्चा होत आहे. सोशल मिडियावर झालेल्या सर्व्हेत महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. तुतारी वाजणार असा जयघोष सुरु असला तरी कमल फुलणार असाही जयघोष सुरु आहे. खरी लढत असलेल्या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य चार जून रोजी कळणार असून यामध्ये उभ्या राहिलेल्या इतर अपक्ष व काही पक्षांचे उमेदवार किती मते घेणार व कोणाचे डिपॉझिट जप्त होणार हेही कळणार आहे.