नाशिक – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची तर औरंगाबाद, नागपूर, कोंकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजित तांबे (अपक्ष) यांच्या उमेदवारीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
अशातच नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमध्येच लढाई होणार असून भाजपा तसेच महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याच मुद्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक माहिती दिली.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’आतापर्यंत आम्हाला कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर या मतदारसंघात अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्या आहेत. त्यांनी एका वर्षापूर्वीच भाजपात प्रवेश केलेला आहे. धनराज विसपुते हेखील भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. शेवटी जोपर्यंत पक्षाच्या राज्य आणि केंद्र संसदीय बोर्डाकडून निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणाला पाठिंबा द्यायचा यावर निर्णय होत नाही. ही अपक्षांची लढाई आहे. त्यामुळे आतापर्यंत पाठिंब्यासाठी आमच्याकडे कोणीही आलेले नाही.’ असं म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.