नवी दिल्ली – भारतीय संघ सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारताने 2023 या वर्षाची सुरुवात अत्यंत दमदार अशी केली आहे. अगोदर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्याची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर आता सुरु असलेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज वनडे मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे.
हा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होणार असून या सामन्यासाठी नुकतंच (शुक्रवारी) भारतीय संघ केरळच्या तिरुअनंतपुरम येथे पोहोचला आहे. सध्या त्यांचे तिरुअनंतपुरम येथील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ देखील सोबत असल्याचं दिसून येत आहे.
यावेळी त्यांनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी संघाचे स्थानिक प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. तसेच, मंदिरात दर्शन घेत पूजा देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, टीम इंडिया या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार असून, यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे.