जयपूर :- भाजपची परिवर्तन यात्रा पूर्णपणे अयशस्वी होईल. भाजप आपल्या नेत्यांना एकत्र करू शकत नाही. अन्य पक्षातले नेते पळवण्यात भाजपा वाकबगार आहे. त्यामुळे तर जनता पुन्हा एकदा राजस्थानमध्ये कॉंग्रेसला सत्तेत आणण्यासाठी आतुर आहे. पंतप्रधान मोदींना नऊ वर्षांत “एक देश-एक निवडणूक’ची आठवण का नाही झाली, अशा शब्दांत राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
सीकरच्या लक्ष्मणगढ विधानसभा मतदारसंघाचे आमदार दोतासरा म्हणाले की, आज भाजप कोणत्याही नेत्याचा चेहरा घेऊन राज्यातील निवडणुका लढवू शकत नाही. त्यामुळे भाजप राज्य विधानसभेसाठीही मोदींचाच चेहरा वापरुन निवडणूक लढवत आहे. पण आता जनतेलाही मोदींचा चेहरा आवडत नाही, कारण मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही.
त्याचवेळी, ‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या शक्यतेचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती ही देशातील संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे दोतासरा यांनी सांगितले असून अशाच आशयाचे विधान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचे सदस्य होण्यास नकार दिला आहे. चौधरी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संदर्भात पत्र लिहिले आहे.