नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेवर हल्लाबोल केला आहे. ही कल्पना म्हणजे भारतीय संघराज्य आणि देशातील सर्व राज्यांवर हल्ला आहे. हा इंडियावर हल्ला आहे. इंडिया म्हणजेच सर्व राज्यांचा संघ आहे. त्यावर अशी संकल्पना लादून त्यांची स्वायत्ताच सरकारने धोक्यात आणली आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या उद्देशाने ही संकल्पना मांडण्यात आली असून, त्यासंबंधात शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने आठ सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. तथापि त्या समितीतून कॉंग्रेस नेते अधीररंजन चौधरी बाहेर पडले आहेत.
तसेच कॉंग्रेस पक्षानेही या संकल्पनेवर टीका केली असतानाच राहुल गांधी यांनीही यावर ट्विटरवरील संदेशाद्वारे हा हल्लाबोल केला आहे. अशी संकल्पना राबवताना त्याला केवळ संसदेची नव्हे तर देशातील सर्व राज्यांच्या विधानसभांचीही मागणी आवश्यक आहे, असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी याआधीच नमूद केले आहे.