नवी दिल्ली – चीनच्या घुसखोरीबद्दल पंतप्रधानांनी मौन का बाळगले आहे असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून लडाख मधील आपला प्रदेश बळकावला आहे. पण त्यावर मोदी अजिबातच गप्प असून ते गायब झाले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि चीन यांच्यात या तणावाच्या संबंधात आणि तेथे झालेल्या घुसखोरी बाबत जी लष्करी चर्चा झाली त्यात चीनने आडमुठी व कडक भूमिका घेतल्याचे वृत्त एकेठिकाणी छापून आले आहे, त्या वृत्ताचे कात्रणही राहुल गांधी यांनी या ट्विटर संदेशासोबत जोडले आहे. चीनने संपूर्ण गलवान खोरे आणि पॅंगॉंग त्सोचा काही भाग व्यापला आहे असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
चीनने केलेल्या अतिक्रमणाबाबत भारत सरकार वस्तुस्थिती लपवत आहे, असा आरोप करून या बाबतची वस्तुस्थिती सरकारने जनतेला समजाऊन सांगावी, अशी मागणीही त्यांनी या आधीच केली आहे.