मुंबई – करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या नवीन उद्योगांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाच्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, या महामार्गाच्या कडेने उद्योगांसाठी मोठ्या वसाहती उभारण्याची गरज असून तेथे त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याची गरज आहे. समृद्धी महामार्ग हे 701 किमीचा मार्ग आहे. मुंबई आणि नागपूरचे अंतर कमी करण्यासाठी हा महामार्ग उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योगांच्या ठिकाणी लोकसंख्येच घनता अधिक असते आणि करोनाच्या काळात तेथेच लॉकडाऊन कडकपणे अंमलात आणावा लागला होता. म्हणून समृद्धी महामार्गाच्या कडेला औद्योगिक वसाहती स्वतंत्रपणे उभारण्याची गरज आहे. या एक्स्प्रेस हायवेच्या लगत अनेक ठिकाणी ट्रॉमा सेंटर उभारण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
राज्यातील 24 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग असून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या, अशी सूचना त्यांनी केली. या प्रकल्पासाठी 8311 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.