मुंबई – फडणवीसांनी 6 सप्टेंबर 2023 चा जीआर का काढला? तोच जीआर रद्द करण्याची आमची मागणी होती. आता दबाव वाढल्याने फडणवीस (Devendra fadanvis) यांनी कंत्राटी पोलीस भरतीचा जीआर मागे घेतला आहे, असे म्हणत माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
अनिल देशमुख म्हणाले, फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, तीन वर्षांपासून पोलीस भरती न झाल्याने पोलिसांचा मोठा बॅकलॉग आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील 3 हजार पोलीस मुंबईत वापरले जातील. त्यामुळे ते कंत्राटीरितीने घेतले जातील. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशमुख म्हणाले की, सिक्युरिटी गार्ड जे आहेत त्यांना पोलीस भरतीत का घेतले आहे.
त्याऐवजी युवकांना काम द्या. त्यांना पोलीस भरतीत घ्या. त्यामुळे सिक्युरिटी गार्ड कंत्राट पद्धतीने भरण्याचा जो निर्णय घेतला आहे तो फडणवीस रद्द करणार का? राज्यातील युवकांना न्याय देणार का? याच उत्तरं आधी त्यांनी द्यावी.
तहसीलदार कंत्राटी नेमणार का?
6 सप्टेंबरच्या जीआरनुसार, जळगावात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची कंत्राटी भरती करण्याची जाहीरात आली. म्हणजे आता तहसीलदारसारखी पदं तुम्ही कंत्राटी पद्धतीने भरणार का? फडणवीसांनी जे काही आता दाखले दिले आहेत. त्यात आम्ही डेटा ऑपरेटर, मोबाइल शिक्षक अशा पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली आहे. पण तुम्ही थेट तहसीलदार कंत्राटी पद्धतीने नेमणार का? असा सवाल देशमुखांनी फडणवीस यांना केला.