मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईवर राज्यातील राजकीय नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, सुप्रिया सुळे ,आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली असताना संजय राऊत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, नागपुरात माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’ काल सकाळी नागपुरातून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आणि दुपारी ईडीनं कारवाई सुरू केली. हे सर्व जनतेचं लक्ष तिकडे वळवण्यातही केले गेले आहे. या कारवाईमध्ये मालमत्ता जप्त करण्याआधी त्यांना बोलवायला हवं होतं. या कारवाईचं भाजपाकडून समर्थन केलं जात आहे. ही हुकुमशाहीच आहे.’ अस म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने थेट ठाकरे कुटुंबावर टीका केली या टीकेवर संजय राऊत म्हणाले,’सोमय्याांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. ते पुढे म्हणाले,’हवाला किंगचे भाजपाच्या लोकांशी संबंध असल्याचे पुरावे मी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. पण त्यावर ईडी कारवाई करत नाहीये.’