भारतानेही समुद्रात दाखल केल्या युद्धनौका
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमरेषेवरील कारवाया काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच आता पाकिस्तानने अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात कुरापती करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानच्या नौदलाकडून अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या अरबी समुद्रात युद्धाभ्यास करण्यासाठी दाखल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाक नौदलाच्या या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी भारताने आपल्या पश्चिम सीमेवर युद्धनौका आणि पाळत ठेवणारी विमानही तैनात केली असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानकडून पुढीचे काही दिवस हा युद्धाभ्यास सुरू राहणार आहे. दरम्यान, या नौदल अभ्यासामध्ये पाक नौदल आपल्या लढाऊ क्षमतेचे मूल्यांकन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर भारतीय पाळत विमान आणि पाणबुड्या पाक नौदलाच्या कारवाईवर बारीक नजर ठेवून असणार आहेत असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर भारतीय वायुसेनेने बालाकोटमधील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी हवाई हल्ला केला होता. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाच्या विरोधात पाकिस्तान सीमेवर सैन्य तैनात सातत्याने वाढवत असल्याचेही गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.