मुंबई – मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यातील भाषेवरून आणि उपस्थित केलेल्या सवालांवरून मोठे वादंग माजले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आत्मसन्मान असणारी व्यक्ती यानंतर त्या पदावर राहणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीताना काळजीपुर्वक शब्द निवडायला हवे होते, असे विधान अमित शहा यांनी नुकतेच केले आहे. यावर शरद पवार म्हणाले कि, गृहमंत्र्यांनी आता स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, त्यामुळे ही म्हण इथे लागू होत आहे की नाही ते पाहावे लागेल. पण राज्यपाल हे शहाणे आहेत, त्यामुळे हा शब्द योग्य आहे की नाही, ते मला माहिती नाही, अशी टीका त्यांनी राज्यपालांवर केली आहे.
मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. सत्तेत असताना अनेक राज्यपालांशी संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे.