मुंबई – भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला. यावर आता बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
बाबरी प्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाबरी पाडली तेव्हा आताचे माजी मुख्यमंत्री कुठे होते? त्यांना बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे.”
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले.”
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, “अयोध्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीत हिंदुत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष आणि त्याग या देशाला माहिती आहे. त्याच त्यागातून आजचा भाजप निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे बाबरी कांडानंतर लखनौला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले आहेत. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपाच्या नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना (एकनाथ शिंदे) त्यांनी विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असे सांगितले होते”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.