मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यातयेत आहेत. राज्यातील एका बलाढ्य पक्षाचे राष्ट्रीयत्व रद्द होणे हा मोठा धक्का आहे. परंतु भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘या निर्णयात धक्कादायक असं काहीच नाही. समजा परीक्षा देताना सहा पेपर द्यावे लागतात, आपण त्यापैकी दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापसचीच येणार आहे. त्यामुळे या निकालाला धक्कादायक कसं म्हणणार.” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर बोलताना मुनगंटीवार यांनी, “आपल्या देशात कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी जे निकष आहेत त्यात एखाद्या पक्षाने किती राज्यांमध्ये निवडणूक लढवावी. किती राज्यांमध्ये किती टक्के मतं घ्यावी यासंबंधीचे निकष असतात. त्यावर ठरतं तुमच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की नाही. ही मतं घेतली नाही तर हा निर्णय धक्कादायक कसा काय? पेपर न देता मेरिटची गुणपत्रिका येणार आहे का? त्यामुळे या निकालात धक्कादायक असं काही नाही हा प्रक्रियेचा एक भाग आहे.” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना, त्यांनी निकष पूर्ण केले नाहीत तर राष्ट्रीय दर्जा राहणार नाही. उद्या त्यांनी कष्ट केले, मेहनत केली तर तो दर्जा परत मिळेल. पुन्हा राज्यांमध्ये लोकप्रियता मिळाली तर निकष पूर्ण होतील, अर्थात लोकप्रियता मिळणं त्यांच्यासाठी कठीण आहे. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.