विभाग लागला कामाला
सातारा – सातारा शहरातून व बाहेरून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरूवात केली आहे. मात्र, सातारा पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला नेमकी जाग कधी येणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे व धुळीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने वाहनधारकांच्यात संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा शहरातील व शहराबाहेरील उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. वाहनधारकांना या रस्त्यांवरून जायचं म्हणजे यमाच्या दारात जाण्यासारखे असल्याचे चित्र आहे. शहरातील राधिका रोड, बुधवार नाका ते मोळाचा ओढा, मोळाचा ओढा ते मेढा रोड, बस स्थानक ते पारंगे चौक, पोवई नाका ते वाढे फाटा, पोवई नाका ते गोडोली नाका, राजपथ, गजानन मंदिर ऐक्य कार्नर, गडकर आळी, अनंत इंग्लिश स्कूल ते गेंडामाळ नाका, गेंडामाळ नाका ते कोटेश्वर मंदिर, शाहूपुरी चौकातून माळवाडीला जाणारा रस्ता यांसह अनेक उपनगरातील रस्त्यांत फक्त खड्डेच खड्डेच निर्माण झाले आहेत.
यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीला सुरूवात केली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या व सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुरूस्तीला नेमका मुहूर्त लागणार तरी कधी, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विसावा नाका ते जिल्हा परिषद चौक, पोवई नाका ते वाढे फाटा तसेच वाढे फाटा ते सातारा तालुक्याच्या हद्दीपर्यंत लोणंद रस्ता, मोळाचा ओढा ते शाहूपुरी पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्ते दुरूस्तीला सुरूवात करण्यात आली आहे. बाकी रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य हटवण्यासाठी सातारा नगरपालिका व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेमका कधी जागा होणार, याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत