नव्या उमेदीने काऱ्हाटी, सुपे परिसरात कांदा, ज्वारी, गव्हाची लागवड सुरू
काऱ्हाटी –“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा…’ या कवी कसुमाग्रजांच्या ओळीची आज काऱ्हाटी परिसरात पुन्हा एकदा प्रचिती आली. गेल्या पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळ पाहणारा येथील शेतकरी यंदा ओल्या दुष्काळाशी दोन हात करतो आहे. परतीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून त्याचे संपूर्ण अर्थकारणच मोडले आहे. मात्र, यातही तो डगमगता पुन्हा उभारी घेत असून रब्बीच्या आशेवर त्याने कांदा, ज्वारी, हभरा, गहू पिकांची लागवड सुरू केली केली असल्याने त्याच्या या चिकाटी नवशिख्यांना प्रेरणादायीच आहे.
काऱ्हाटी-सुपे परिसरामध्ये अतिपाण्यामुळे कांदा, हरभरा पीक जागेवर सडून गेले. हतबल झालेला शेतकरी पुन्हा उभारी येऊन परिसरामध्ये पुन्हा एका नव्या आशेवर शेतामध्ये राबताना दिसत आहे. चालू वर्षी कांदा पिकाला चांगला दर मिळत आहे व भविष्यात बाजार चांगलाच राहील या आशेवर शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करीत आहे.
विशेषत: गावरान कांद्याचे पीक घेण्यासाठी व कृषी विभागाने दिलेल्या सुधारित बीबीएफ पेरणी यंत्राच्या साह्याने आधुनिक पीक पद्धतीला परिसरातील शेतकरी प्राधान्य देत आहेत. चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टिमुळे पुढील वर्षापर्यंत तरी शेतकऱ्यांच्या बोअरवेल, विहीर यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी राहिल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेतीमध्ये राबत आहे.
सुपा बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाचे प्रमाण विक्री प्रमाणापेक्षा कमी असल्याने भिजलेल्या बाजरीला सुद्धा 1600 रुपये क्विंटल तर चांगल्या बाजरीला 2000 ते 2800 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.
– पांडुरंग चांदगुडे,आडतदार, सुपा