वरिष्ठांचे दुर्लक्ष; कचऱ्यासोबत मद्याच्या रिकाम्या बाटल्याही
सातारा – देशभरात स्वच्छ भारत मोहिमेद्वारे सर्वत्र स्वच्छता केली जात असताना सातारा येथील सहायक जिल्हा निबंधक कार्यालयाला मात्र याचे काहीच देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचा ढीग साचला असून कचऱ्यात मद्याच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सातारा शहरात तहसीलदार, प्रांत कार्यालय तसेस सहायक जिल्हा निबंधक कार्यालय तथा मुद्रांक जिल्हाधिकारी या कार्यालयाचा सातारा तालुक्यातील पर्यायाने जिल्ह्यातील नागरिकांचा दररोज संबंध असतो. मात्र, या कार्यालयाच्या आवारात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. कार्यालयाच्या आवारात साचलेला कचरा नागरिकांच्या आरोग्याला बाधक ठरत आहे. संतापाची बाब अशी की कचऱ्यासोबतच मद्याच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा टाकल्या असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करतच नक्की मद्यपी कोण, असा सवाल केला आहे.