शिवसेनेचा गृहमंत्री अमित शहांना सवाल
मुंबई : देशात सध्या एनआरसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनेक राज्यातून लाखो लोकांना भारताचे नागरिकत्व नाकरण्यात येत आहे. त्यातच आता एनआरसीच्या मुद्यावरून शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच थेट सवाल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अमित शहा हेच सांगत आहेत. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत व घुसखोरांना बाहेर फेकण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. शहा म्हणतात, प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू. प्रश्न इतकाच आहे की, नक्की केव्हा?,असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील सभेत प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू, असे सांगितले. त्यावरून शिवसेनेने अमित शहा यांना चिमटा काढत कधी काढणार? असा प्रश्न केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं एनआरसीवर भाष्य केले आहे. एकेका घुसखोरास देशाबाहेर फेकू, असे गृहमंत्री अमित शहा यांनी बजावले आहे. अमित शहा यांनीच असे बजावल्याने देशात आता एकही घुसखोर राहणार नाही हे नक्की. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अमित शहा हेच सांगत आहेत. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत व घुसखोरांना बाहेर फेकण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सर्वाधिक घुसखोर प. बंगालात आहेत व तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या व्होट बॅंकेवर विशेष लोभ आहे. एनआरसी झाले तर जे हिंदू वगैरे लोक येथे आले आहेत त्यांनाही देश सोडावा लागेल अशी भीती घालण्यात येत आहे. ती भीती अमित शहा यांनी निराधार ठरवली.
आठ दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी दिल्लीत गेल्या. त्या पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांना भेटल्या व कोलकात्यात येऊन ममतादीदींनी जाहीर केले, प. बंगालात एनआरसी होणार नाही. तसे माझे पंतप्रधानांशी बोलणे झाले आहे. पण आता गृहमंत्री शहा यांनीच या बातमीचे खंडन केले व सांगितले की, राष्ट्रीय नागरिक नोंदणी कार्यक्रम प. बंगालातही राबवला जाईल. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याराज्यांत बेकायदा निवास करणाऱ्यांना आधी हुडकून काढायचे व नंतर देशाबाहेर फेकायचे ही मोहीम जोरदार आहे. श्री. शाह म्हणतात, प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू. प्रश्न इतकाच आहे की, नक्की केव्हा?, या प्रश्नाला शिवसेनेनं उत्तर मागितले आहे.