मुंबई- राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता स्थापनेबाबत भाजपा-शिवसेनेत काय ठरलंय हे सर्वांसमोर यावे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. खडसे म्हणाले, महायुतीचे राज्य यावं ही सर्वांची इच्छा आहे. शिवेसना-भाजपामधील ताणतणावं काही दिवसांत मिटेल आणि सत्ता येईल, असा मला विश्वास वाटतो.
दरम्यान, केवळ मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेची नाराजी नाही तर शिवसेनेच म्हणणं आहे जे ठरले त्याप्रमाणे व्हावे. त्यामुळे ज्यांच्यासमोर जे काही ठरलें आहे ते सर्वांसमोर यावे. तरीही शिवसेना-भाजपात मध्यस्थी करण्याऐवढा आता मी मोठा राहिलो नाही, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली.
राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केले आहे. त्यावर अमित शहा यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आमच्यासमोरही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचेच नाव आहे. सत्तास्थापनेबाबत भाजपा बॅंकफुटवर नाही तर भाजपचा तो स्वभाव आहे. युती टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. दोघा भावांमध्ये समन्वय व्हावा, युती तुटी नये यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे, असेही यावेळी खडसे म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानंतर सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल का? यावर बोलताना खडसे म्हणाले, संघाने भाजपाला राजकारणाबाबत आदेश दिल्याचे मला आठवत नाही. संघाने कायमच सल्लागाराची आणि मार्गदर्शकाची भुमिका बजावली आहे.