महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन 15 दिवस पूर्ण होतील. ही निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिवसेना यांना राज्यातील जनतेने बहुमताचा जनादेश दिला असूनही अद्याप सरकारची स्थापना झालेली नाही. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मतदारांनी दिलेला कौल मान्य करून विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे. “हीच ती वेळ’ या शब्दरचनेचा वापर करून प्रचार करणारी शिवसेना आणि “मी पुन्हा येईन’ अशी डरकाळी फोडून प्रचार करणारा भाजप यांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे की राज्यातील मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आदर करण्याची “हीच ती वेळ’ आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील या शीतयुद्धाचा आता उबग येऊ लागला असून मतदारांना गृहीत धरण्याचे काम या दोन्ही पक्षांनी करू नये हे त्यांना कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे. अनेक राजकीय पक्ष अशा जनादेशाची प्रतीक्षा करीत असताना भाजप आणि शिवसेना मात्र या जनादेशाचा अनादर करत असतील तर मतदार पुढील वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. या निवडणुकीत भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्याने आणि इतरही काही आमदारांची साथ त्यांना मिळणार असल्याने बहुमत सिद्ध करण्यात कोणतीच अडचण नाही; पण लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन पक्षांत जे काही ठरले आहे त्याचा तपशील हाच कळीचा मुद्दा बनू पाहात आहे. सत्ता आणि पदांमध्ये निम्मा निम्मा वाटा देण्याचे ठरले असल्याने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे, तर असे काही ठरले नसल्याचे सांगून भाजप शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देऊ पाहात आहे.
सत्ता आणि पदांमध्ये निम्मा वाटा याचा अर्थ मुख्यमंत्रिपद वाटून घेणे असा होत नाही, असा युक्तिवाद भाजप करीत आहे तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच असे आश्वासन दिल्याचे शिवसेना ठासून सांगत आहे. या दोन पक्षांमध्ये नक्की काय ठरलंय हे त्यांचे त्यांनाच माहीत असले तरी त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याला मदत करेल अशी शिवसेनेची भावना होती; पण राष्ट्रवादीने पहिल्या दिवसापासून विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील चर्चेत हाच निर्णय झाला होता.
शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप-शिवसेना यांनीच सरकार स्थापन करावे, आम्ही विरोधी बाकावर बसू अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे आता अन्य कोणतेही समीकरण जुळण्याची शक्यता नसल्याने भाजप आणि शिवसेना यांना एकमेकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी बेताल विधाने करून वातावरण गढूळ केले आहे. या काळात अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे यांनी कोणतेही विधान करून हे वातावरण निवळावे यासाठी प्रयत्न केले नाहीत, पण आता या नेत्यांनाच समोर येऊन भूमिका जाहीर करावी लागेल. निवडणुकीचा निकाल लागल्यास हे दोघे पत्रकारांना एकत्र सामोरे जातील आणि विजय स्वीकारतील अशी अपेक्षा होती; पण तसेही झाले नाही. आता मात्र या दोघांना कोंडी फोडावीच लागेल. सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवून विक्रम केलेल्या फडणवीस यांना पुन्हा सत्तेवर येऊन आणखी एक विक्रम करण्याची संधी मतदारांनी उपलब्ध करून दिली आहे.
ती संधी गमावणे म्हणजे आत्मघात ठरणार आहे. दुसरीकडे शिवसैनिकालाच मुख्यमंत्रिपदी बसवणार अशी घोषणा करणारे उद्धव ठाकरे यांनी टोकाचा आग्रह सोडून आता चर्चेच्या टेबलावर यायला हवे. काही झाले तरी शिवसेना सत्तेत राहणार आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचे आहे ते करणे तेव्हाच शक्य होणार आहे. भाजपचा पूर्वीही अनुभव गाठीशी असल्याने शिवसेनेने यावेळी ताक फुंकून प्यायले तर ते समजण्यासारखे असले तरी सध्या सत्तेत वाटा असणे हे जास्त महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही. गेल्या पाच वर्षांच्या काळात शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षांप्रमाणे वागत होती. त्याचा भाजपलाही त्रास झाला आहे. त्यामुळेही शिवसेनेचा सत्तेतील वाटा आणखी वाढवणे कितपत धोकादायक ठरेल याचा विचार भाजप नेते करीत आहेत.
निर्णय घेण्याची ताकद आणि क्षमता असलेले दोन्ही पक्षातील नेते असेच गप्प राहिले तर कोंडी कधीच फुटणार नाही. एक राजकीय रणनीती म्हणून शिवसेनेच्या चाली कितीही योग्य असल्या तरी त्यांना कोठेतरी पूर्णविराम देण्याची गरज आता लक्षात यायला हवी. येत्या दोन दिवसांच्या काळात सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट अटळ आहे. त्या परिस्थितीला दोन्ही पक्ष जबाबदार असतील. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सतत म्हणत आहेत की, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार स्थापन करावे; पण काही निश्चित ठरल्याशिवाय असे करणे योग्य होणार नाही याची कल्पना भाजपला आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपाल शिवसेनेला पाचारण करतील आणि तेव्हा कॉंग्रेस आघाडीचा पाठिंबा मिळेल अशा आशेवर कदाचित शिवसेना असेल; पण आम्ही विरोधीपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे कॉंग्रेस आघाडीने अनेकवेळा जाहीर केले आहे.
ज्या शरद पवार यांनी गेल्या वेळी निकाल लागल्या लागल्या भाजपला पाठिंबा जाहीर केला होता ते शरद पवार यावेळी संधी आणि गरज असूनही कोणाला पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. याचा अर्थ शिवसेनेला समजून घ्यावा लागेल. ज्या पक्षांनी मतदारांना एकत्रपणे मते मागितली आहेत आणि म्हणून मतदारांनी त्यांना बहुमत दिले आहे. त्या पक्षांनी या जनादेशाचा आदर करून राज्यात सरकार देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. भाजप आणि शिवसेना यांनी ही वेळ चुकवली तर आगामी काळात दीर्घकाळ पुन्हा विरोधी बाकांवर बसण्याचा जनादेश मिळू शकतो हे विसरू नये.