शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू झाले. मात्र, त्यामागील वास्तव किंवा त्यातील नेमक्या अडचणी मांडल्याबद्दल दैनिक प्रभातचे मनापासून धन्यवाद. पालक मेटाकुटीस आलेत. ऑनलाइन अभ्यासक्रमात एकदा शिकवलेला भाग पुन्हा शिकविला जाणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, हे नक्की. त्यामुळे ज्यांना शैक्षणिक सुविधांची खरी गरज आहे. तेच या ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहणार. स्वभावाने चंचल असणाऱ्या मुलांचे अवधान वर्गातच 30 मिनिटे टिकत नाही.
ते ऑनलाइनला कसे टिकणार? हा देखील प्रश्नच आहे. म्हणजे उद्याच्या काळात शिक्षणात खूप मोठी दरी निर्माण होईल. मोठ्या संस्थांनी ऑनलाइनची चांगली तयारी केली. पण काही सिंगल मॅनेजमेंट शाळेत. छोट्या संस्थेत व ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागात चित्र वेगळे आहे. तिथे ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी अजून टॉवरलाच जागा नाही. ते शोधण्याचे काम चालू आहे.ऑनलाइन एज्युकेशनच्या टॉवर उभारणीला व ऑनलाइन अध्यापनाची रेंज पकडायला मानसिकतेची भींत आडवी नक्कीच येत आहे.
शैक्षणिकदृष्ट्या अनभिज्ञ, मागास असणारे खरे गरजवंत आहेत. या प्रक्रियेत शैक्षणिक नुकसान हे अशा गरजवंताचेच होईल. हे नुकसान भरून न निघणारे असेल.शासनाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी ऑनलाइन एज्युकेशन हा नाविन्यपूर्ण प्रकल्प होऊन बढती,पगारवाढीसारखी बक्षिसी मिळेल, काही संस्था ऑनलाइन एज्युकेशनचा दिमाखदार सोहळा करून विद्यार्थ्यांना आपणाकडे खेचतील. सोशल मीडियाशी आत्यंतिक नाळ जुळलेले शिक्षक बांधव आधुनिक शिक्षणाशी घनिष्ठता निर्माण झाल्याचा हर्षोल्हास साजरा करतील. शासन, शिक्षणसंस्था, त्यांचे कर्तव्य पार पाडतील.पण, व्यवस्थेचा बळी ठरणार ते सामान्य विद्यार्थीच.
राजेंद्र कोतकर
माध्यमिक शिक्षक, नगर.
संपर्क: 9404980951