वाघोली – पाणीप्रश्न सोडवण्यासाठी योजना मंजूर असूनदेखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास दिरंगाई होत असल्याने वाघोली ग्रामस्थांच्या वतीने पीएमआरडीए कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
वाघोली हे पुणे महानगरपालिके शेजारील अतिशय वेगाने नागरीकरण होणारे गाव असून गावाची लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच लाख आहे.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मुख्य गावठाण, वाड्या-वस्त्या, नवीन प्लॉटिंगमुळे विकसित होत असलेले भाग, सोसायटी रहिवासी, भविष्यात गावात विकास होणारे परिसर या सर्व ठिकाणी मुख्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत आहे. त्यामुळे या कार्यकारी मंडळाने सन 2018मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे वारंवार पाठपुरवठा करून वाढीव नळ पाणीपुरवठा योजना (22 कोटी रुपये) वढू डॅमची मंजूर करून घेतली होती. या कामाचा शुभारंभ करण्याचा आदेश दि. 19 सप्टेंबर2019 रोजी देण्यात आले होते.
या गोष्टीला 7 ते 8 महिने होऊन गेले; परंतु योजनेचे कामकाज वारंवार पाठपुरावा करूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे बुधवारी (दि. 17) सकाळी 12 वाजता पीएमआरडीच्या औंध येथील कार्यालवर वाघोली गावातील सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर राखून आंदोलन करण्यात आले. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार व नियोजनकार गीतेकर यांचाशी वाघोलीतील सर्व समस्या विषयी चर्चा करून निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर या योजनेचे काम सुरू होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाठबळावर सतत पाठपुरावा करूनदेखील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने आंदोलन करण्यात आले. यापुढील काळात ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने सहकार्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-संदीप सातव,
माजी उपसरपंच, वाघोली