भाजपचे नेते आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांचा बाप काढण्याचा जो भयंकर प्रकार घडला, त्यावरून आज दिवसभर त्यांच्यावर आणि अन्य वाचाळ भाजप नेत्यांवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. हे वक्तव्य अंगलट येत असल्याचे दिसताच शेलार यांनी माफी मागितली आहे.
“आपल्या या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, तर आपण माफी मागतो,’ असे साळसूदपणे सांगून ते नामानिराळे होऊ पाहात आहेत. पण त्यांच्या या अश्लाघ्य वक्तव्याची धग इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. “महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही,’ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावरून “महाराष्ट्र काय तुझ्या बापाचा आहे काय,’ असा एकेरी उल्लेखाचा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरण्याचे धाडस महाराष्ट्रात आजवर कोणत्याच मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत कोणत्याही नेत्याने केले नव्हते. पण शेलार नावाच्या भाजप नेत्याने तो उपद्व्याप करून ठेवला आहे. भाजपच्या हातातील सत्ता गेल्याने त्यांचे नेते सध्या बेताल झाले असल्याचे दिसते आहे. वास्तविक, “एनआरसी’ हा विषयच केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही,’ असे स्पष्टीकरण खुद्द पंतप्रधानांनी दिल्यानंतर “महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानात आक्षेप घेण्यासारखे काही नाही.
“एनआरसी’ हा काही कायदा नाही. ती एक नागरिकांच्या पाहणीची व त्यांच्या नागरिकत्वाच्या मुळाचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे “केवळ मुसलमानच नव्हे तर येथील हिंदूंनाही आपले नागरिकत्व सिद्ध करणे त्रासदायक ठरणार असल्याने, आपण ही प्रक्रिया महाराष्ट्रात लागू करणार नाही,’ अशी भूमिका घेण्याचा एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला पूर्ण अधिकार आहे. केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब अशा राज्यांनीही “एनआरसी’बाबत हीच भूमिका घेतली आहे. \
मग उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडल्यानंतर त्यांच्यावर एकेरी उल्लेख करीत शेलारांनी हल्लाबोल करण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला भाजपचा विरोध असू शकतो, पण तो त्यांना सभ्य भाषेत आणि वेगळ्या शब्दांत व्यक्त करता आला नसता काय, हा मुख्य प्रश्न आहे. भाजपच्या नेत्याने असे बेताल वक्तव्य करण्याचे हे एकमेव उदाहरण नाही. आज सर्वच पातळ्यांवरील भाजप नेत्याकंडून असे प्रकार राजरोस होऊ लागले आहेत.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील एका जाहीर सभेत “गोली मारो’ची जी घोषणा देण्यास लोकांना उद्युक्त केले, तो विषय अजून चर्चिला जातो आहे. केंद्रीय मंत्रीच लोकांना असे उघड भडकावत असतील, तर त्याचे सामाजिक परिणाम काय होतात, याची प्रचितीही लागलीच आली आहे. दिल्लीत सध्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तेथेही सध्या भाजप नेत्यांकडून केली जाणारी बेताल वक्तव्ये बातम्यांचा विषय ठरत आहेत.
आज महाराष्ट्रात आशिष शेलारांची ही असभ्य टीकाटिप्पणी सुरू असतानाच तिकडे कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे हे थेट महात्मा गांधी यांच्यावरच घसरले आहेत. “महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान म्हणजे एक नाटक होते, त्यांचा हा स्वातंत्र्यलढा ब्रिटिशांशी संगनमत करूनच लढला गेला होता,’ असा नवीन शोध त्यांनी लावला आहे. संपूर्ण जगात वंदनीय असलेल्या महात्मा गांधींचा हेगडे यांनी आपल्या बेफाट वक्तव्यांनी जाहीर अवमान केला आहे.
भाजप नेते असे संतुलन ढळल्यासारखे एकदमच का चवताळून उठले आहेत याचे आकलन होत नाही. “सीएए’, “एनआरसी’, “एनपीआर’ वरून संपूर्ण देशभर असंतोष आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा विरोध भाजप नेत्यांना असह्य ठरत असला, तरीही लोकांचा विरोध करण्याचा अधिकार ते नाकारू शकत नाहीत, ही पण वस्तुस्थिती आहे. “सीएए’ विरोधकांना सरकारने सत्तेचा अमर्याद वापर करून पुरते जेरीला आणले असले, तरी अजूनही पूर्ण संयम राखून आणि हातात राष्ट्रध्वज घेऊन ही आंदोलने सुरू आहेत. सरकारच्या दमनकारी वर्तणुकीतून खरे म्हणजे आंदोलकांचा संयम ढळणे शक्य होते; पण येथे उलटेच होताना दिसत आहे. आंदोलनकर्त्यांच्या संयमाची परीक्षा बघताना भाजप नेत्यांचाच तोल ढळू लागल्याचे पदोपदी जाणवते आहे. केवळ “सीएए’ किंवा “एनआरसी’च नव्हे तर अन्यही मुद्द्यांवरून भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची आतषबाजी सुरू आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका महिला तहसीलदाराच्या संबंधात असेच एक अवमानकारक विधान केले होते. त्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत, लोणीकर यांना “घरचा आहेर’ दिला, हे बरे झाले. राजकीय जीवनात वावरणाऱ्यांनी सभ्यतेला तिलांजली देणे कोणत्याच अर्थाने समर्थनीय ठरत नाही. आपल्या भाषणातील जोरकसपणा सिद्ध करण्यासाठी बेताल वक्तव्येच केली पाहिजेत, असे नव्हे. मुद्देसूदपणेही आक्रमक भूमिका घेता येऊ शकते. पण याचाच विसर भाजप नेत्यांना सध्या पडलेला दिसून येतो आहे. आज आशिष शेलारांनी असभ्य भाषेचा वापर केला, त्यांच्या वक्तव्याला “जशास तसे’ उत्तर देताना मग सत्ताधारी आघाडीतल्या नेत्यांनाही अशाच शब्दप्रयोगाचा आश्रय घ्यावासा वाटू लागतो.
जितेंद्र आव्हाडांनी शेलारांचा प्रतिवाद करताना, “आम्ही त्यांच्यासारखा गुजरातमध्ये बाप शोधायला जात नाही,’ असे नमूद करीत त्यांच्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न केला; तर अरविंद सावंतांनी शेलारांची लायकी काढली.
शेलार आपल्या वक्तव्यानंतर काही वेळातच बॅकफूटवर जात माफीनामा सादर केल्यानंतर त्यांच्या विरोधातल्या नेत्यांनीही मग आपल्या भाषेचा रोख बदलत संसदीय भाषेचा वापर करून शेलारांवरील टीकाटिप्पणी चालू ठेवावी लागली आहे. अन्यथा आज दिवसभर ही शाब्दिक धुळवड चांगलीच रंगली असती. आज अन्य कोणापेक्षाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर जाहीर स्वरूपात सभ्यतेने बोलण्याची जबाबदारी अधिक आहे कारण ते केंद्रातील सत्ताधारी आहेत. सामाजिक सलोखा टिकवण्याची त्यांच्यावरची जबाबदारी अधिक आहे, हे लक्षात घेऊनच त्यांनी आता वक्तव्ये केली पाहिजेत.