बारामती -बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील त्यांची तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. औदुंबर पाटील यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कारभारी चारीटेबल ट्रस्टचे सचिव प्रशांत सातव यांनी केली आहे. त्यामुळे पवारांच्या बारामतीत चाललं तरी काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.
चुकीच्या पद्धतीने कामकाज करून गैरकारभार केल्याचे आरोप प्रशांत सातव यांनी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यावर केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे देखील सातव यांनी निरीक्षक पाटील यांच्या कामकाजाबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे चौकशीचे काम सोपविले असल्याची माहिती अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.
काही प्रकरणात शिरगावकर यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने त्या प्रकरणाबाबत इतर सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल असेही मोहिते यांनी सांगितले. दरम्यान, प्रशांत सातव यांनी अजित पवार यांना पत्र लिहून औदुंबर पाटील, त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रकरणात चुकीच्या पद्धतीने कारवाई करुन अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप करत यापूर्वी पाटील यांनी कशा पद्धतीने चुकीचे कामकाज केले हे निदर्शनास आणणार असल्याचे सातव यांनी स्पष्ट केले.
एका कुटुंबाने केली होती तक्रार
एका महिलेने पाटील यांच्या संदर्भात केलेल्या गंभीर स्वरुपाच्या आरोपांबाबत मार्च महिन्यापासून लेखी तक्रार देऊनही काहीच कार्यवाही होत नाही, ही बाब गंभीर असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्रक सादर करुनही कारवाई तर दूरच मात्र चौकशीही झालेली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संबंधितांची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे.