मुंबई – महाराष्ट्रात 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. मात्र आता प्रकल्पाची चर्चा होत आहे. भारताच्या विकासासाठी आपण समुद्रालाही टक्कर देऊ शकतो, हे अटल सेतू पूल उभारणीवरून दिसून येत असल्याचेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईतील शिवडी न्हावा शेवा अर्थात अटल सेतूसह विविध विकासकामांचे लोकार्पण पार पडले. त्यानंतर नवी मुंबईतील विविध विकासकामांचेही भूमीपूजन केले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आज ऐतिहासिक दिवस आहे, मुंबईत विकासाचा सोहळा होत असून, याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्षे आहे. देशाला जगातील सर्वात मोठ्या पुलांपैकी एक असलेल्या विशाल अटल सेतूचे आज लोकार्पण झाले. भारताच्या विकासासाठी आपण समुद्रालाही टक्कर देऊ शकतो. लाटाही तोडू शकतो. मी 24 डिसेंबर 2016 रोजी ट्रान्स हार्बर लिंक अटल ब्रिजच्या पायाभरणीसाठी आलो होतो, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटले होते की, लिहून ठेवा की, देश बदलेल आणि पुढेही जाईल. तेव्हा मोदींची गॅरंटी होती आणि आजही तीच गॅरंटी देशभर चालत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून अटल सेतू देशवासीयांना समर्पित करत आहे. आमच्यासाठी पायाभरणी, भूमिपूजन, उद्घाटन हे केवळ एका दिवसाचे कार्यक्रम नाहीत. माध्यमांमध्ये दिसण्यासाठी आणि लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प हे भारताच्या नावीन्यपूर्णतेचे माध्यम आहे. ज्याप्रमाणे एका विटेतून उंच इमारत बांधली जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकल्प भारताची भव्य इमारत बांधत असतो. आज देशातील मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित 33 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले, असेसुद्धा त्यांनी सांगितले.
हे प्रकल्प रस्ते, मेट्रो आणि पाणी यांसारख्या सुविधांनी जोडलेले आहेत. आज मुंबईला आधुनिक भारतरत्नम मिळाला आहे जो व्यापार जगातला मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते अजित पवार यांच्यापर्यंतच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र विकास करत आहे. देशातील माता, भगिनी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी मोदींनी दिलेली हमी महाराष्ट्र सरकारही पुढे नेत आहे. मुख्यमंत्री, महिला सक्षमीकरण अभियान, शक्ती दूतसुद्धा अशीच योजना आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले.