मानसिंगराव नाईक यांचा सवाल
शिराळा – शेतकऱ्यांच्या घामाचे दाम व राबणाऱ्या हातांचे पगार बुडवून त्यांना अनंत यातना देणारे हे कसले लोकप्रतिनिधी, असा सवाल मानसिंगराव नाईक यांनी उपस्थित केला. सुरूल (ता. वाळवा) येथे जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. राजारामबापू कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील व आनंदराव पाटील उपस्थित होते.
नाईक म्हणाले, विरोधकांनी गेली पाच वर्षे सत्ता असूनही मतदार संघात कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. त्यांचे वय झाल्याने त्यांच्याकडील उत्साह संपलेला आहे. त्यांना मतदार संघातील जनतेची व विकासाची काळजी करायला वेळ नाही. सदा सर्वकाळ ते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या विविध संस्था बंद पडल्या असून त्यावर अवलंबून असणारे कर्मचारी बेकार झाले आहेत. त्यांना कित्येक महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत.
शेतकऱ्यांना ऊस गाळपाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे राबणाऱ्या हातांना वेदना देण्याचे व त्यांचे जिवन दुःखी करण्याचे पाप लोकप्रतिनिधींनी केले आहे. अशा लोकप्रतिनिधींना आता रिटायर करण्याची वेळ आली आहे. येत्या 21 तारखेला ही संधी मिळणार असून शिराळा-वाळव्यातील संघातील तमाम मतदार बंधू, भगिनी घड्याळापुढील बटण दाबून मला विजयी करतील. विकासाच्या मार्गातील अडथळा दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शंकरराव चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिराळा तालुका वारकरी सांप्रदायाचे तालुकाध्यक्ष भिकाजी चव्हाण, संचालक आनंदराव पाटील व जे. वा. पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस मंजूषा पाटील उपस्थित होत्या.