नवी दिल्ली – गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. त्यामुळे आज कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या मतमोजणी तृणमूल काँग्रेस जवळपास 191 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.त्याचबरोबर भाजप 96 जागांवर आघाडीवर आहे.पश्चिम बंगालमध्ये एकूणच तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे असे असले तरी नंदिग्रामध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचा मतदार संघ असून बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. नंदीग्राममधून आठ जण निवडणूक लढवत आहेत.
चौथ्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सात हजार मतांनी पिछाडीवर असून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. एकीकडे राज्यात तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जी यांच्यावर पराभवाचं सावट आहे.फक्त पश्चिम बंगालच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.